बंगाली साहित्य आणि संगीत आणि एकंदरीतच भारतीय कलांना नवा आकार देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. त्यांच्या ‘गीतांजली’ या रचनेला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाल्याच्या घटनेला १० डिसेंबर २०२० रोजी १०७ वर्षे पूर्ण झाली. १० डिसेंबर १९१३ रोजी त्यांना हे पारितोषिक देण्यात आले होते. नोबेल पारितोषिक मिळवणारे टागोर हे युरोपबाहेरचे पहिलेच व्यक्तिमत्त्व होते. रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्य आणि बंगाली भाषा यावर निरतिशय प्रेम करणारे मराठी साहित्यिक म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांची जन्मशताब्दी गेल्या वर्षी झाली. ‘पुलं’च्या टागोरांवरील प्रेमाची अनुभूती देणारे सादरीकरण येथे देत आहोत.
‘शब्दवेध, पुणे’ निर्मित ‘अपरिचित पुलं’ हा कार्यक्रम रत्नागिरीत पुलोत्सवा’त सादर झाला होता. हे सादरीकरण त्या कार्यक्रमातीलच आहे. या कार्यक्रमाचे संकलन चंद्रकांत काळे यांनी केले होते. ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, ज्येष्ठ अभिनेते-गायक चंद्रकांत काळे आणि अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी या कार्यक्रमात ‘पुलं’च्या अपरिचित साहित्याचे बहारदार अभिवाचन केले.
‘विझे दिवसाचा दिवा, सूर्य बुडाला बुडाला,
मेघ आकाशी जमले, लोभ चंद्राशी जडला’
ही रवींद्रनाथ टागोर यांची ‘पुलं’नी मराठीत अनुवादित केलेली कविता या कार्यक्रमात गिरीश कुलकर्णी यांनी सादर केली. तसेच, ‘शांतिनिकेतनमधला शेवटचा दिवस’ हा ‘पुलं’चा लेख चंद्रकांत काळे यांनी सादर केला.
(पुलं म्हणजे मराठीतले टागोर, असं मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केलं होतं. त्यांची मुलाखत पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)